हिंगोली : राज्यात कोरोनाची सरासरी संख्या मंदावलेली दिसून येत आहे. मात्र राज्यातील काही भागांत अजूनही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण मिळून येत आहेत. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. दर दिवसाला शेकडोच्या संख्येने रुग्ण संख्या आढळून येत आहे. आज एकाच दिवसात तब्बल १४४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने वाढणारी रुग्ण संख्या जिल्हावासियांची सुद्धा चिंता वाढवणारी आहे. आज घडीला हिंगोली जिल्ह्यात ३८४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३९६ कोरोना बाधित रुग्णांनी जीव गमावला आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, डोकेदुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना काही लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ उपचार करून, आरटीपीसीआर चाचणी करून तपासणी केली जात आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत चालल्यामुळे नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन वारंवार जिल्हा प्रशासन करू लागले आहेत. तसेच जिल्ह्यातील आठवडी बाजार, लग्न समारंभ, आदी कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GS3r4U
https://ift.tt/34VS8L3
0 Comments