
तिरुवनंतपूरम : केरळच्या अलाप्पुझा जिल्ह्यात विरोधी पक्ष भाजप आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कलम १४४ लावत जमावबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या हत्यांचा निषेध केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री विजयन यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. SDPI चे राज्य सचिव के. एस. शान यांची शनिवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. ते घरी निघाले असताना त्यांची हत्या झाली. शान हे दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शान यांना कोच्चीतील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रात्री उशिरा दाखल करण्यात आलं. तिथे त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. SDPI ने या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप केला आहे. तसंच त्यांनी हत्येचा कट रचल्याचं SDPI म्हणणं आहे. SDPI च्या नेत्याच्या हत्येला १२ तास उलटत नाही तोच काही अज्ञातांनी केरळ भाजपचे ओबीसी विभागाचे सचिव रंजीत श्रीनावसन यांची घरात घुसून हत्या केली. यामुळे या दोन राजकीय हत्यांनी केरळ हादरलं आहे. या दोन्ही हत्यांचा तपास केरळ पोलिसांकडून करण्यात येत आहे. भाजप आणि SDPI ने एकमेकांवर हत्येचे आरोप केले आहेत. रंजीत यांच्यावर चाकूने वार करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. अशा प्रकारची घृणास्पद आणि अमानुष हिंसेची कृत्ये राज्यासाठी धोकादायक आहेत. मला खात्री आहे की प्रत्येकजण अशा मारेकरी गटांना आणि त्यांच्या द्वेषपूर्ण वृत्तीला ओळखून वेगळे करण्यासाठी तयार असतील, असं मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 'देवाची भूमी जिहादींसाठी स्वर्ग बनवल्याचा', आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी सीपीएमच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारवर केला आहे. केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनीही या हत्येचा निषेध केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना टॅग करत ट्विट केले आहे. केरळमध्ये 'गुंडाराज' (अराजकतेने) आणखी एक अनमोल जीव घेतला. सीपीआयएम शासित राज्य आता ‘हत्येच्या मैदानात’ बदलत आहे. कायदा आणि सुव्यवस्था नाही. नागरिकांना संरक्षण नाही. मारेकरी मोकाट आणि फरार झाले आहेत. लज्जास्पद आहे, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. एसडीपीआय पक्षाचे प्रमुख एमके फैजी यांनीही ट्विट केलं आहे. 'राज्यात जातीय हिंसाचार घडवून जातीय सलोखा बिघडवणे हा संघ परिवाराच्या अजेंड्याचा एक भाग आहे. आरएसएसच्या दहशतवादाचा निषेध करा. केरळ पोलिसांची उदासीन वृत्ती ही आरएसएसच्या मनसुब्यांना चालना देणारी आहे, असा आरोप फैजी यांनी केला आहे.
from India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mkvFx5
https://ift.tt/3yEysGv
0 Comments