औरंगाबाद : औरंगाबाद राज्यातील २६ जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची मुदत मार्चअखेर संपणार आहे. करोना परिस्थितीमुळे पावणेदोन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता झेडपी, पंचायत समिती निवडणुका वेळेत होणार की, लांबणार याचा संभ्रम अद्याप कायम आहे. औरंगाबादसह राज्यातील २६ जिल्हा परिषदांची मुदत मार्चअखेर संपणार आहे. जिल्हा परिषदांतर्गत पंचायत समित्यांचीही मुदत संपणार आहे. एप्रिल २०२० मध्ये मुदत संपलेल्या महापालिका, काही नगरपालिकांच्या निवडणुका करोनामुळे सातत्याने लांबणीवर पडल्या आहेत. मध्यंतरी राज्य सरकारने महापालिका वॉर्डांची हद्दवाढ केली. त्यात महापालिकांची वॉर्ड संख्या वाढली. त्या धर्तीवर ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी केली होती. राज्य सरकारने झेडपी व पंचायत समित्यांची हद्दवाढ करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर प्रशासनाकडून प्रक्रिया राबविली गेली. दरम्यान, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव देशभर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका वेळेत होणार की, मुदतवाढ मिळणार याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार सर्वपक्षीय आढावा घेऊन याबाबतचे मत जाणून घेणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत मुदतवाढीचा निर्णय होऊ शकतो. असे झाले नाही तर, नियोजित वेळेतच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम सुरु होईल. सध्या त्याबाबत काहीच निर्णय न झाल्याने संभ्रमावस्था कायम आहे. गटांची फेररचना अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळे इच्छुकांना नेमके कुठे शक्तीप्रदर्शन करायचे याचा निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3tN8sbw
https://ift.tt/3FVMyVG
0 Comments