औरंगाबाद : करोनाच्या तिसऱ्या लाटेत करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. करोनाबाधितांमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्यादेखील जास्त आहे. करोना संसर्गाच्या तीव्रतेला त्यांना सामोरे जावे लागत नसले तरी पाच ते सात दिवस अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ बाधितांवर येत आहे. ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या पार्श्वभूमीवर करोनाची तिसरी लाट सुरू झाल्याचे मानले जात आहे. या तिसऱ्या लाटेत करोनाबाधित उपचाराच्या दृष्टीने गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जास्तीत जास्त बाधितांना गृह विलगीकरणात ठेवले जात आहे. केवळ दहा टक्के रुग्ण खासगी दवाखान्यांमधून किंवा कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सक्रिय करोनाबाधितांची माहिती मिळाली आहे. या विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार ४६२७ रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १४०० रुग्णांशी महापालिकेच्या वॉररूममधून संपर्क साधण्यात आला. त्यांच्यापैकी १०७५ जणांनी करोना प्रतिबंधाची लस घेतल्याचे स्पष्ट झाले. लस घेतल्यावर देखील या सर्वांना करोनाची लागण झाली आहे. २५४ जणांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे वॉररूममधून झालेल्या संपर्कातून लक्षात आले आहे. उर्वरित रुग्णांशी संपर्क साधण्याचे काम केले जात असून, त्यातून लस घेतलेल्या व लस न घेतलेल्यांची संख्या स्पष्ट होईल अशी माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. ४६२७ रुग्णांपैकी ५४ रुग्ण मेल्ट्रॉनच्या कोव्हिडकेअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोविड केअर सेंटरमध्ये ५० रुग्ण दाखल आहेत, तर खासगी रुग्णालयात आठशे रुग्ण दाखल झालेले आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33CyCTN
https://ift.tt/3FWGhZY
0 Comments